भिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती आणि तेथे पाणी सत्याग्रहही केला होता. त्या आठवणीला पडघ्यातील नागरिकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त उजाळा दिला. डॉ. बाबासाहेबांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह सर्वांना माहिती आहे; मात्र पडघ्यातील या सत्याग्रहाबद्दल तितकी माहिती सर्वांना असतेच असे नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पडघा येथे पाणी सत्याग्रह आयोजित केला होता. त्यासाठी डॉ. आंबेडकर काशिनाथ दोंदे यांच्याकडे उतरले होते. पडघ्यातील सुप्रसिद्ध सडकेवरची विहीर सत्याग्रहासाठी निवडण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सत्याग्रहींनी विहिरीचे पाणी काढले होते. या घटनेचा संदर्भ ठाणे संघसरिता या पुस्तकामध्ये आहे.
पडघा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती, असे समतानगर येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ‘आम्ही लहान होतो, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडघ्यात आले होते. तेव्हा पडघा परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त होते. पडघा येथे त्यांची सभा झाली होती,’ अशी आठवण हिराबाई सोनावणे (वय ८२) यांनी सांगितली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३वा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर २०१९ रोजी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.